स्मिता जयकर या बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री. बाहेरून बघता असे वाटते, की त्या एक वलयांकित जीवन जगल्या. परंतु त्यांचे आयुष्य असे घडले आहे, की त्यावर एखादा चित्रपट सहज निघू शकेल. त्यांना लागलेल्या स्वतःच्या आयुष्याच्या, अस्तित्वाच्या शोधाबद्दल त्यांनी पुस्तक लिहिले. नीला सत्यनारायण यांनी त्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला असून, ‘आत्ता नाही तर केव्हा...?’ या नावाने ते अनुवादित पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे सात ऑक्टोबर २०१७ रोजी पुण्यात प्रकाशित होते आहे. त्या निमित्ताने, हे पुस्तक लिहिण्यामागची स्मिता जयकर यांची भूमिका येथे प्रसिद्ध करत आहोत. .............
तुम्हाला वाटत असेल, की एक अभिनेत्री आध्यात्मिक विषयावर पुस्तक का बरे लिहीत आहे? अशी शंका येणे साहजिक आहे. उद्या जर मला असे कळले, की एखादा इंजिनीअर औषधे देतो आहे, तर माझ्याही मनात अशीच शंका येईल. परंतु वास्तवात माझे अभिनेत्री होणे आणि आध्यात्मिक असणे या दोन्ही परस्परविरोधी गोष्टी नाहीतच. माझ्याच व्यक्तिमत्त्वाचे ते दोन पैलू आहेत. प्रत्येक माणसाला अनेकविध मुखवटे असतात. त्यांच्यात साम्य असणे गरजेचे नाही. एका झाडाची फांदी आणि त्याची पाने या दोघांमध्ये काहीच सारखे नसते. झाडाची फांदी जाड आणि जड असते. पान मात्र छोटेसे आणि नाजूक असते. झाडाची फांदी स्पर्शाला कठीण वाटते. पान मात्र कोमल असते. अशीच भिन्नता झाडाच्या इतर भागांमध्येही असते. जे झाडाचे तेच आपले. अनेक विरोधी गोष्टींचा संगम आपल्यात झालेला असतो आणि तरीही आपण एकच व्यक्ती असतो. माझ्याही बाबतीत तसेच घडले आहे. अभिनय आणि अध्यात्म दोन्ही मीच आहे. अभिनय जसा माझ्या रक्तातून वाहतो, तसेच अध्यात्म माझ्या गात्रांतून झिरपते. मी तर असे म्हणेन, की माझे व्यक्तिमत्त्व अध्यात्मावर आधारलेले आहे.
गेली तीन तपे मी स्वतःचा शोध घेते आहे. आता मला एक वैश्विक सत्य समजले आहे आणि ते म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाची बैठक आध्यात्मिकच आहे. काही जणांना त्याची जाणीव आहे एवढेच. आयुष्यातल्या चढ-उतारांबरोबर मला अनमोल असे व्यावहारिक आणि आध्यात्मिक अनुभव मिळाले, ज्यांनी माझ्याच अस्तित्वाचे अनेक पदर मला उलगडून दाखविले. हेच अनुभव मी तुमच्याबरोबर वाटून घेणार आहे. जीवनाची ही सत्ये तुमचेही आयुष्य समृद्ध करतील यात शंकाच नाही.
मी बोधिसत्त्व असल्याचा दावा करत नाही. मीही तुमच्यासारखी एक साधक आहे. जरी मी अनेक वर्षे अध्यात्माच्या मार्गावर प्रवास करत आहे, तरीही मी हे पुस्तक एका सामान्य माणसाच्या भूमिकेतून लिहिले आहे. मी एक अशी व्यक्ती आहे जिने अध्यात्मातले अद्भुत बदल अनुभवले आहेत. म्हणूनच मी ते शब्दबद्ध करायचा निर्णय घेतला. माझ्यात घडलेल्या या स्थित्यंतरामुळे कदाचित तुमच्या शंका फिटतील. तुम्हालाही मोकळ्या मनाने माझा संदेश स्वीकारावासा वाटेल. तर.. अशी झाली माझ्या या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात.
आध्यात्मिक स्थित्यंतर माझ्या एवढे रोमारोमांत भिनले आहे, की मलाही कळत नाही की हे असे जगायला मी कसे शिकले. मला असे वाटते, की माझे जुने शरीर त्यागून नवा जन्म घेतला आहे. या बदलाबद्दल मी ऋणी आहे.
नकारात्मक गोष्टींचे ओझे मी मागे टाकले आहे. आता मला अगदी हलके आणि शांत वाटत आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यालाही मी शांतपणे आणि समाधानाने सामोरी जाते. त्या भयंकर दुष्टचक्रातून बाहेर पडून मी एक नवीन उंची गाठल्याचे मला समाधान वाटते.
...............
(सात ऑक्टोबर रोजी प्रकाशन झाल्यानंतर हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.)